Powered By Blogger

Saturday, June 18, 2011

भांडण

भांडण मग ते लहान असो कि मोठे ते त्रासदायकच असते. खरे सांगायचे तर ९९% भांडणे हि भांडणे नसतातच फक्त गैरसमजातून वाढलेली बोलाचाली असते ती आणि अशा बोलाचालीचे चे अवडंबर करून लोक टोकाचे निर्णय घ्यायला निघतात. 

काही वेळा समोरच्या व्यक्तीचे बोलणे अपूर्ण ऐकून, कधी अर्थाचे अनर्थ घेऊन, पूर्वग्रह मनात ठेवून आपण आपलेच गैरसमज वाढवत राहतो, अमुक एका  परिस्थितीत हि व्यक्ती अशीच वागेल, किंवा एखादी गोष्ट करताना आपणच समोरच्याच्या हेतून विषयी आडाखे बांधतो आणि स्फोटक प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो. परिणामी जिथे वादविवादाला जागा नसते तिथेच वादविवाद सुरु होतो.

अशा प्रसंगांकडे आपण थोडे तटस्थपणे पहिले, समोरच्याची भूमिका समजावून घेऊन, मग शांतपणे आपली  प्रतिक्रिया दिली, आपली मते मांडली तर....वादविवाद टळू शकतात, काही विधाने हसण्यावारी घेऊन विनोद समजून दुर्लक्षित केली तरीही खुपदा आपण संवादाला चांगले वळण देवू शकतो. 

कितीही काहीही झाले तरी मनाचा तोल ढळू न देता, चर्चेला योग्य दिशेने समंजस शब्दात, साखर पेरत पुढे नेता येवू शकते, दोष सगळ्यांमध्ये असतात आणि आपण नाती जोडताना ती चांगल्या वाईट गुणांसह स्वीकारलेली असतात, मग पुन्हा त्याच्या नावाने वाद घालणे योग्य नाही. परिस्थितीनुरूप माणूस आपल्यातल्या वाईट गुणांना दूर सारून चांगले वागण्याचा प्रयत्न करतो आपण फक्त संयम ठेवून त्याला तेवढा वेळ दिला पाहिजे. आपण आपल्यातल्या दुर्गुणांना दूर सारण्या साठी वेळ मागतो, तसा तो समोरच्याला का देवू नये? 

आयुष्य हे खूप लहान आहे, आणि आपल्या सहवासातल्या प्रत्येकाला देण्या साठी आपल्या जवळ वेळही कमी आहे. हा छोटासा काळ प्रत्येकाशी छान आणि गोड बोलण्यासाठी वापरला तर.... अनेकदा ज्या गोष्टी कुठल्याच प्रयत्नाने साध्य होत नाही, त्या गोड बोलून साध्य करता येतात फक्त आपल्या मनाची तयारी हवी, आपण कोणाचही मन दुखावले नाही तर आपलेही मन दुखवणे कोणालाही शक्य होणार नाही.
हसतमुख माणसाच्या चेहऱ्यावरचे हसू कोणी हिरावून घेवू शकत नाही, 

आता आपण ठरवायचे हसतमुख व्हायचे कि रडतराउत?

No comments:

Post a Comment